अड्याळची माणुसकी उजळली; अपघातग्रस्तांसाठी ३.५ लाखांची मदत उभी - भीषण दुर्घटनेनंतर सर्वधर्मीय एकजूट...
प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, भंडारा
भीषण अपघाताच्या दुःखातून सावरत असताना अड्याळ गावाने माणुसकी आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या मारोती व्हॅनला ट्रकची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अड्याळ येथील नगरे कुटुंबातील तिघींचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली होती.
शुक्रवारी तिघींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा संपूर्ण गाव अश्रूंनी भारावून गेले होते. या अपघातात रक्षा खेडकर आणि नेहा नान्हे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे लक्षात येताच गावातील सर्वधर्मीय युवक, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत तब्बल ३.५ लाख रुपयांची मदत जमा केली. विशेष म्हणजे अड्याळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या पगारातून ५० हजार रुपयांचे योगदान देत संवेदनशीलतेचे उदाहरण दाखवले.
अपघातग्रस्त कुटुंबे भूमिहीन असून उपचाराचा खर्च पेलणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी उभारलेली मदत महत्त्वाची ठरत असली तरी, शासनानेही पुढाकार घेत या कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
या दुर्दैवी घटनेत पाच जणांना गमावूनही अड्याळ गावाने दाखवलेली एकजूट आणि माणुसकीची भावना संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘मदतीची भिंत’ म्हणून या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
1
Angry
0
Sad
0
Wow
0