राजकीय : खराबवाडी ग्रामपंचायतीचा ९ वर्षांचा वनवास संपणार? निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांच्या गोटात मोठी चलबिचल..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण: तब्बल नऊ वर्षांपासून निवडणुकांपासून वंचित राहिलेल्या खराबवाडी ग्रामपंचायतीचा निवडणुकांचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा झाला आहे. सध्या प्रशासकीय पातळीवर मतदार याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ऑगस्टच्या ४ ते ५ तारखेदरम्यान मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर तातडीने कार्यवाही करून सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) म्हणजेच मतदार यादी दुरुस्ती प्रक्रियेत ग्रामपंचायत निवडणूक होणार नसून, ही निवडणूक SIR मतदार यादी ग्राह्य न धरता थेट मूळ विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी ग्राह्य धरूनच पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर होऊन निवडणुकीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे आणि प्रशासनाच्या या हालचालींमुळे गेली कित्येक वर्षे निवडणुकांची वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.
यापूर्वी काही नागरिकांच्या आडमुठ्या धोरणामुळे खराबवाडीची वॉर्ड रचना उच्च न्यायालयापर्यंत गेली होती. या कायदेशीर वादामुळे आणि इतर कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडली. यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणुकांची तयारी करूनही त्यांना नाईलाजास्तव गप्प बसावे लागले होते. काहींनी गावात निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले, तर काही इच्छुक अद्यापही घराघरांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यातच व्यस्त आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, नक्की कोण कुणाच्या बाजूने आपले राजकीय भविष्य आजमावणार आणि कोण कुणासाठी राजकीय भविष्य दावणीला लावणार, याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली आहे.
मात्र, या सर्व उत्साहावर एक मोठी राजकीय तलवारीची छाया देखील वावरत आहे. गावात सध्या अशी जोरदार चर्चा आहे की, खराबवाडीतून लवकरच 'वाघजाईनगर ग्रामपंचायत' नव्याने अस्तित्वात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी खराबवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भरमसाठ खर्च करून निवडून यायचे आणि पदावर बसण्यापूर्वीच जर वाघजाईनगर नवी ग्रामपंचायत अस्तित्वात आली, तर नवनिर्वाचित सरपंच किंवा सदस्यांना मोठा राजकीय धक्का बसू शकतो. त्यामुळे भविष्यातील राजकीय अस्थित्वाचा विचार करून नेमके किती उमेदवार रिंगणात उतरतात आणि कितीजण केवळ आर्थिक नुकसान नको म्हणून बघ्याची भूमिका स्वीकारतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0