Road-Related Issues || कागदावर ‘ग्रामीण मार्ग २०५’ चा शिक्का, पण रस्त्याचं नशीब कधी बदलणार?
१५ वर्षांच्या उपेक्षेनंतर वाघजाईनगरच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश येण्याची चिन्ह? जिल्हाधिकाऱ्यांचा १० सप्टेंबरचा दौरा निर्णायक ठरणार?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: चाकण-तळेगाव महामार्ग आणि चाकण-आंबेठाण जिल्हा मार्गाला जोडणारा वाघजाईनगरचा रस्ता गेली दीड दशक प्रशासकीय पटलावरून गायब होता की काय, अशी स्थिती होती. कोट्यवधी रुपये खर्चून तयार झालेला सिमेंट रस्ता मागील १५ वर्षांत केवळ खड्ड्यांचे साम्राज्य बनून राहिला. मात्र, ग्रामस्थांचा संताप आणि चिवट पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या मार्गाला शासनाकडून अधिकृतपणे ‘ग्रामीण मार्ग क्रमांक २०५’ असा दर्जा मिळाला आहे. कागदावर नाव कोरले गेले खरे, पण आता प्रत्यक्ष डांबराचा मुलामा कधी चढणार आणि खऱ्या अर्थाने हा रस्ता कधी मोकळा श्वास घेणार, याकडे वाघजाईनगर गावच्या ग्रामस्थांचे डोळे लागले आहेत.

१.७५ कोटींचा रस्ता अन् १५ वर्षांचा अंधार..
खराबवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच योजना सोमवंशी यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत निधीतून ५४ लाख, जिल्हा परिषदेचे २० लाख आणि स्थानिक कंपन्यांच्या फंडातून लोकवर्गणी गोळा करून तब्बल १.७५ कोटी रुपयांचा सिमेंट-काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सलग १५ वर्षे सार्वजनिक बांधकाम किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागाने या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. देखभालीअभावी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आणि प्रवाशांच्या नशिबी मणक्यांचे आजार आले.

ग्रामस्थांचा एल्गार अन् प्रशासनाला जाग..
वाघजाईनगर परिसरातील वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र पाहून स्थानिक ग्रामस्थ राहुल शेलार, सचिन शिळवणे, नवनाथ शेडगे, दत्ता शिळवणे, आकाश भोसले, दत्ता साठे आणि अमोल वाळुंज यांनी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवणे सुरू केले. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्याकडे ग्रामस्थांनी थेट गाऱ्हाणे मांडले. त्यांनी रस्त्याची माहिती घेतली असता हा रस्ता ग्रामीण मार्गात वर्ग झाल्याचे समोर आले. यासाठी महत्वाची भूमिका खराबवाडी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून हा रस्ता ग्रामीण मार्गात वर्ग करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून घेतली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुठे तरी या रस्त्याच्या प्रश्नाला वरील ग्रामस्थ यांच्यामुळे वाचा फुटल्याचे बोलले जात आहे.
या संघर्षाला खरी गती मिळाली ती चाकण ट्रॅफिक मुक्त कृती समितीचे सदस्य कुणाल कड यांच्या पुढाकारामुळे. त्यांनी थेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. परिणामी, चाकण औद्योगिक वसाहतीतील अतितातडीने दुरुस्त करावयाच्या १८ रस्त्यांच्या प्राधान्य यादीत या रस्त्याचा समावेश करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
१० सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची ‘ग्राउंड टेस्ट’
पुढील पाच ते सहा महिन्यांत हा रस्ता पूर्ण क्षमतेने चकाचक करण्याचे नियोजन आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या १० सप्टेंबर रोजी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी चाकण परिसरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी संभाव्य नामुष्की टाळण्यासाठी आणि नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी खराबवाडी ग्रामपंचायतीने स्वतःहून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
"आमच्या वाघजाईनगर रस्त्याचा वनवास एका रात्रीतला नाही, गेली अनेक वर्षे नागरिक या नरकयातना भोगत आहेत. आता अचानक काहींचे डोळे उघडले असतील, तरी आम्ही श्रेयवादात न पडता हा रस्ता पूर्णत्वास कसा जाईल आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित कसा होईल, यासाठीच शेवटपर्यंत लढत राहणार."
— राहुल शेलार, ग्रामस्थ, वाघजाईनगर
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0