आंदोलन || कोट्यवधींचा महसूल गिळणाऱ्या व्यवस्थेचा बळी ठरतेय चाकण! जनतेच्या अश्रूंची दखल घेत गणेश बोत्रेंचा प्रशासकीय अनास्थेविरुद्ध निर्णायक लढा!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण :: कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या आणि जागतिक स्तरावर 'ऑटो हब' म्हणून मिरवणाऱ्या चाकण एमआयडीसीचा श्वास आज प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नियोजनशून्यतेमुळे पुरता कोंडला गेला आहे. दररोजच्या भीषण वाहतूक कोंडीत तासन्तास अडकून पडणारे कामगार, रखडणारे रुग्ण, आणि मेटाकुटीस आलेले उद्योजक यांच्या आक्रोशानीही झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. शेवटी या सामान्य जनतेच्या आणि कामगारांच्या रोजच्या नरकयातना पाहून, लोकांच्या हक्कासाठी धावून जाणारे संवेदनशील जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी प्रशासकीय अनास्थेविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

प्रशासकीय अपयशाचा कळस आणि जनतेचा कोंडमारा..
दररोज हजारो वाहनांची वर्दळ असणाऱ्या चाकणमध्ये वाहतूक व्यवस्था अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. रस्ते रुंदीकरण, पर्यायी मार्ग आणि नियमित ट्रॅफिक नियंत्रणाबाबत वारंवार निवेदने देऊनही स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न राहिला. जागतिक पातळीवर भारताचे नाव झळकवणारी ही औद्योगिक नगरी आज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वाहतुकीचा सापळा बनली असून, परदेशी गुंतवणूकदारांमध्ये चाकणची बदनामी होत आहे.
जनतेच्या वेदनेशी एकरूप झालेले नेतृत्व: गणेश बोत्रे
प्रशासनाच्या या निर्लज्ज शांततेविरुद्ध राजकीय पोळी न भाजता, जनतेच्या दैनंदिन त्रासाला वाचा फोडण्यासाठी गणेश बोत्रे यांनी घेतलेला पुढाकार दिलासादायक ठरत आहे. रस्त्यावर अडकून पडणाऱ्या एका सामान्य कामगारापासून ते आर्थिक नुकसान सोसणाऱ्या उद्योजकांपर्यंत सर्वांचे अश्रू पुसण्यासाठी बोत्रे यांनी साखळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या या प्रामाणिक तळमळीमुळेच या आंदोलनाला राजकीय स्वरूप न राहता त्याचे एका लोकचळवळीत रूपांतर झाले आहे.

'डाऊ'च्या ऐतिहासिक लढ्याची आठवण; टाळ-मृदुंगाच्या नादात हलणार व्यवस्थेचे सिंहासन..
हे आंदोलन साधेसुधे नसून त्याला संत तुकोबारायांच्या पावन भूमीतील वारकरी संप्रदायाचा नैतिक व आक्रमक पाठिंबा मिळाला आहे. खेड तालुक्यातून ज्याप्रमाणे वारकऱ्यांच्या भक्तीशक्तीने 'डाऊ'सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीचा गाशा गुंडाळायला भाग पाडले होते, तसाच इतिहास पुन्हा घडण्याची चिन्हे आहेत.
• देहू देवस्थान, भामचंद्र डोंगर सप्ताह समिती आणि भंडारा डोंगर देवस्थान यांच्या आशीर्वादाने हे आंदोलन उभे राहिले आहे.
• दोन दिवस टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा घोष आणि महिला वारकऱ्यांच्या भजनांच्या माध्यमातून ढिम्म प्रशासनाची 'शांतीभंग' आरती केली जाणार आहे.
• विविध ग्रामपंचायती, कामगार संघटना, एचआर प्रतिनिधी, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि महिला बचत गट यांनी एकमुखाने बोत्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
सामान्य जनतेचा संयम आता संपला असून, गणेश बोत्रे यांच्या रूपाने जनतेला आपल्या हक्काचा आवाज मिळाला आहे. टाळ-मृदुंगाच्या शांत, पण धारदार गजरानंतरही जर प्रशासनाला जाग आली नाही, तर या आंदोलनाचा भडका संपूर्ण औद्योगिक पट्ट्याला वेठीस धरणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे हादरवून सोडल्याशिवाय राहणार नाही.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0