Political || खेडच्या पश्चिम भागातील अन्यायकारक लोडशेडिंगविरोधात जि.प. सदस्य समीर सुपे आक्रमक; महावितरणला दिला तीव्र आंदोलनाचा इशारा..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
वाडा(खेड) : खेड तालुक्यातील पश्चिम आणि डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित आणि अन्यायकारक लोडशेडिंगमुळे शेतकरी व ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेत, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य समीर भाऊ सुपे यांनी थेट महावितरणच्या (MSEDCL) वाडा येथील कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत लोडशेडिंगचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
सायंकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत..
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक-दोन महिन्यांपासून दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत भोरगिरी फीडरवरील वीजपुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवला जात आहे. सायंकाळची ही वेळ ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची असते. याच काळात दूध काढणे, जनावरांना चारा देणे, शेतीची कामे, घरातील स्वयंपाक आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ असतो. त्यातच हा भाग डोंगराळ आणि दुर्गम असल्याने पावसाळ्यात वीज नसल्यास अंधाराचा फायदा घेऊन साप किंवा वन्यप्राण्यांचा धोका वाढतो. या सलग तीन ते चार तासांच्या वीज कपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
समीर सुपेंचा अधिकाऱ्यांना खडा सवाल...
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर समीर भाऊ सुपे यांनी तत्काळ महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले की, "लोड व्यवस्थापनाचे नाव घेऊन केवळ पश्चिम भागातील शेतकऱ्यांनाच का वेठीस धरले जात आहे? जर लोड मॅनेजमेंट करायचेच असेल, तर संपूर्ण तालुक्यात समान पद्धतीने वीज कपात करा. केवळ एकाच भागावर अन्याय का?"
समीर सुपे पुढे म्हणाले की, "सामान्य आणि गरीब शेतकरी वारंवार कार्यालयांच्या पायऱ्या चढू शकत नाही. त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर हा अन्याय केला जात असेल, तर तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही."
"आंदोलनाचा मार्ग अटळ" - समीर सुपे
यावेळी समीर सुपे यांनी महावितरण प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. "पश्चिम भागातील हे अन्यायकारक लोडशेडिंग तत्काळ बंद करावे, अन्यथा या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल," अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य दिनेश हांडे, तसेच परिसरातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. समीर सुपे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून, आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0