‘अँग्लो इंग्लिश मिडीयम’ची शाळा की लूटमारीचा अड्डा? मुलांच्या भवितव्याची राखरांगोळी करणाऱ्या व्यवस्थापनाला खेड शिक्षण विभागाचे 'मौनी' संरक्षण?
खराबवाडीतील बोगस शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; कारवाई कधी?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड(पुणे) : खराबवाडी येथील 'अँग्लो इंग्लिश मिडीयम' शाळा शिक्षणदानाचे पवित्र कार्य करत नसून पालकांच्या खिशाला कात्री लावणारा एक 'लूटमारीचा अड्डा' बनली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवून अक्षरशः 'खंडणीखोर' पद्धतीने पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या या बोगस शाळेला खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे 'डोळेझाकू' धोरण चांगलेच फावले आहे. या शाळेच्या बेकायदेशीर कारभारावर गट शिक्षण अधिकारी साहेबांची संशयास्पद 'मौनव्रताची' भूमिका आता चर्चेचा आणि संतापाचा विषय बनली आहे.
शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने बोगसगिरीचा 'कल्ला'..
शाळेचे संस्थापक आणि व्यवस्थापक केवळ गोड बोलून पालकांना फसवण्यात माहीर आहेत. शाळेच्या नावाखाली जमा झालेला लाखो रुपयांचा निधी कुठे खर्च होतो? शिक्षकांचे पगार का थकवले जातात? शाळेच्या जागेचे भाडे का दिले जात नाही? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाही, खेड पंचायत समितीचा शिक्षण विभाग मात्र 'जैसे थे' परिस्थितीत आहे. वारंवार तक्रारी करूनही गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून केवळ "नोटीस काढतो", "बघतो" अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यावरून 'डाल में कुछ काला नहीं, बल्कि पूरी दाल ही काली है', असा संशय व्यक्त होत आहे.
भावी पिढीच्या आयुष्याशी 'धोकादायक खेळ'..
शाळेत ना उच्चशिक्षित शिक्षक आहेत, ना शासनाचे नियम पाळले जातात. अशी शाळा चालवणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बळी देणे आहे. तरीही शिक्षण विभाग इतका निगरगट्ट का झाला आहे? त्यांना नक्की कशाची भीती वाटतेय किंवा कशाचे दडपण आहे? हे प्रश्न आता सर्वसामान्य पालकांच्या मनात घर करून आहेत. तालुक्यात अशा अनेक शाळांकडे शिक्षण विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने, 'सुशिक्षित भारत' घडवण्याचे स्वप्न फक्त दिवास्वप्नच राहील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गटशिक्षण अधिकारी साहेब, जाग यायला अजून किती 'वेळ' लागणार?
शिक्षण विभाग जर अशा बोगस शाळेला पाठिशी घालत असेल, तर 'सुशिक्षित भारत' आणि 'भविष्यातील उज्ज्वल पिढी' ही केवळ कागदी स्वप्ने उरतील. आपली निष्क्रियता भविष्यातील पिढीला बरबाद होण्यास कारणीभूत ठरेल. आजही वेळ गेलेली नाही, आपल्या डोळ्यांवरची 'भ्रमाची' पट्टी काढा आणि या 'खंडणीखोर' शाळांवर कारवाईचा बडगा उगारा. अन्यथा, येणाऱ्या पिढीच्या शापाचे धनी आपण व्हाल एवढे मात्र नक्की.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
1
Sad
0
Wow
0