Charity scam || कळसेश्वर देवस्थानच्या 'कारभाऱ्यांचा' गावाला गंडा? ऑडिट रिपोर्ट आणि घटनेतील फेरबदलातून धक्कादायक वास्तव समोर!
गावकऱ्यानो आता तरी डोळे उघडा..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले(अहिल्यानगर) : तालुक्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक केंद्र असलेल्या परमपूज्य सुभाषपुरी महाराज कळसेश्वर देवस्थान, कळस बुद्रुक येथील कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमधील मालमत्तेची नोंद आणि मूळ घटनेत मागील दाराने केलेले बदल पाहता, गावाला अंधारात ठेवून देवस्थानवर 'नागोबा' बनून बसण्याचा डाव काही ठराविक मंडळींनी आखल्याचा संशय बळावला आहे.
महाराजांच्या खासगी मालमत्तेवर ट्रस्टचा डोळा?
२०२४-२५ च्या ऑडिट रिपोर्टनुसार, ज्या मालमत्ता प्रत्यक्षात परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांच्या नावावर आहेत, त्या थेट देवस्थानच्या मालमत्तेत (Immovable Property - ₹१५,९६,९३३) दाखवण्यात आल्या आहेत. हा अत्यंत गंभीर तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा आहे. महाराजांच्या वैयक्तिक नावावरील मालमत्ता ट्रस्टच्या रिपोर्टमध्ये परस्पर कशी काय समाविष्ट केली गेली? कारभाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करून या मालमत्ता हस्तांतरित तर केल्या नाहीत ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे. जर या मालमत्ता कायदेशीररित्या हस्तांतरित झाल्या नसतील, तर ऑडिट रिपोर्टमध्ये त्या दाखवणे हा गावकऱ्यांची आणि धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.
'तहहयात' शब्दाचा घुसखोर अर्क: कोणाचे डोके चालले?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ट्रस्टच्या घटनेत झालेली 'जादुई' फेरबदल. २०२१ मध्ये जेव्हा ही ट्रस्ट अस्तित्वात आली, तेव्हा 'तहहयात' (Life-term) असा कोणताही शब्द विश्वस्तांच्या कार्यकाळाबाबत नव्हता, अशी चर्चा आहे. मात्र, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत घटनेत बदल करून सर्व विश्वस्त 'तहहयात' राहतील अशी तरतूद करण्यात आली. हा बदल नक्की कोणत्या 'शुक्राचार्याच्या' सांगण्यावरून झाला? गावाला आणि भक्तांना विश्वासात न घेता स्वतःच्या खुर्च्या कायमस्वरूपी सुरक्षित करण्यासाठी ही खेळी कोणाच्या डोक्यातून निघाली, हे आता चव्हाट्यावर येणे गरजेचे आहे.
भक्तांची आणि देवाची 'हाय' घेऊ नका!
ट्रस्टच्या नियमावलीनुसार, विश्वस्त हे केवळ व्यवस्थापक असतात, मालक नव्हे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता काही कारभारी देवस्थानला स्वतःच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या विश्वस्तांना या गैरप्रकारांची माहिती नाही, त्यांनी गावच्या आणि देवाच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा तात्काळ राजीनामे देऊन बाजूला व्हावे, असा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.
ग्रामसभेचा एल्गार आणि जाब विचारण्याची वेळ..
कळस बुद्रुकमधील ग्रामस्थांनी आता डोळे उघडून या प्रकरणाचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. तात्काळ मोठी ग्रामसभा भरवून या कारभाऱ्यांना समोर बोलवावे आणि घटनेत बदल कोणी व का केला? महाराजांच्या मालमत्तेचे काय झाले? याचे उत्तर मागावे. अन्यथा, हा धार्मिक ठेवा काही लोकांच्या खासगी मालमत्तेसारखा वापरला जाईल आणि देव अशा चुकीच्या कारभाऱ्यांना कधीही माफ करणार नाही.
आता चेंडू कळसकरांच्या दरबारात आहे—देवस्थान वाचवायचे की कारभाऱ्यांच्या घशात जाऊ द्यायचे?
घटनेतील महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे:
• ऑडिट रिपोर्ट: मार्च २०२५ अखेर एकूण मालमत्ता ₹२९,४४,४२७.०५ दाखवण्यात आली आहे.
• घटनेतील तरतूद: नियम ६ नुसार विश्वस्त 'तहहयात' राहतील असे नमूद केले आहे, जे मूळ लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात असल्याचे दिसते.
• मालमत्ता हस्तांतरण: कलम ३६ नुसार कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या व्यवहारासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांची पूर्वपरवानगी अनिवार्य असते.
क्रमश:
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1