Trusty Scame || साक्षात देवही माफ करणार नाही! कळसेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांची 'गुपचिळी' अन् अहिल्यानगरच्या छुप्या वाऱ्या...
विश्वस्तांची गुपचिळी आणि पारदर्शकतेचा अभाव; कळस बुद्रुकमध्ये संतापाची लाट..
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले (अहिल्यानगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील कळस बुद्रुक येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विश्वस्तांनी गावाला अंधारात ठेवून, उपविधीमध्ये (By-laws) स्वतःच्या फायद्याचे बदल करून ट्रस्टवर मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार विचारणा करूनही आर्थिक ताळेबंद आणि नोंदणी प्रमाणपत्राबाबत माहिती देण्यास विश्वस्त टाळाटाळ करत असल्याने, या 'धार्मिक' कारभारात नक्की काय 'अधर्मी' शिजतंय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
उपविधीत 'शब्दांचा खेळ' आणि ग्रामस्थांची फसवणूक..
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रस्टच्या विश्वस्तांनी उपविधीमध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर शब्दांची अशी काही गुंफण केली आहे, ज्यामुळे भविष्यात हा ट्रस्ट गावाच्या हातातून निसटून काही व्यक्तींच्या खासगी मालकीचा होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. २१ विश्वस्तांच्या या जगात बऱ्याच जणांना 'उपविधी' म्हणजे काय? आणि त्यातील नियम काय आहेत, याचे साधे ज्ञानही नाही. केवळ 'पद' मिळाले म्हणून मिरवणाऱ्या या विश्वस्तांमुळे देवस्थानचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
अहिल्यानगरच्या वाऱ्या आणि पडद्यामागच्या हालचाली..
ट्रस्टच्या कारभारात सावळागोंधळ घालणाऱ्या काही प्रमुख सुत्रधारांनी आता आपली नाचक्की वाचवण्यासाठी अहिल्यानगर येथील कार्यालयांमध्ये वाऱ्या सुरू केल्या आहेत. ज्यांना विनासायास पदे मिळाली आहेत, ते आता आपली खुर्ची वाचवण्यासाठी फोनाफोनी करून दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गावात या बेबनाव कारभाराची चर्चा आता चव्हाट्यावर आली असून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
विश्वस्त ग्रामसभेला का घाबरतात?
• जर कारभार पारदर्शक आहे, तर विश्वस्त ग्रामसभेला समोर जाण्यास का कचरत आहेत?
• आर्थिक ताळेबंद जाहीर करण्यात कोणती अडचण आहे?
• ग्रामस्थांना ट्रस्टचे सभासद करून घेण्यास विश्वस्त असमर्थता का दाखवताय?
• उपविधीत नियमावली करताना गावाला विश्वासात का घेतले नाही?
केवळ आपसात बैठका घेऊन 'हितगुज' करणाऱ्या या विश्वस्तांनी आता ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ आली आहे.
परमपूज्य सुभाषपुरी बाबांचा दाखला अन् इशारा..
कळसेश्वर देवस्थानच्या अधिकारावर डोळा ठेवून गावाची फसवणूक करणाऱ्यांना साक्षात देव आणि परमपूज्य सुभाषपुरी बाबा कधीही माफ करणार नाहीत, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. चुकीच्या पद्धतीने उपविधीत बदल करणारा 'मुखिया' कोण? हे आता गावासमोर येणे गरजेचे आहे. जर हा गोंधळ लवकर मिटला नाही आणि विश्वस्तांनी पदाचा मोह सोडला नाही, तर येणाऱ्या काळात ग्रामस्थ अधिक तीव्र पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0