Trust Selection Process || कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचा कार्यकाळ संपला; नवीन 'कारभारी' कोण? ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण...!
आठ नऊ वर्षांचा कार्यकाळ उलटूनही सभासद नोंदणी शून्य वार्षिक सभा आणि ताळेबंदाचा पत्ता नसल्याने विद्यमान विश्वस्तांवर संशयाची सुई...
लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी :
अकोले (अहिल्यानगर): संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात श्रद्धेचे स्थान असलेल्या कळस बुद्रुक येथील प्रसिद्ध कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचा पाच वर्षांचा अधिकृत कार्यकाळ संपुष्टात आला आहे. मात्र, गेल्या आठ-नऊ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या विद्यमान कारभाऱ्यांनी अद्याप पायउतार होण्याचे संकेत न दिल्याने गावात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. 'आता तरी खुर्ची सोडा आणि नवीन शिलेदारांना संधी द्या', असा सूर सजग ग्रामस्थांमधून उमटत आहे.
पारदर्शकतेचा अभाव; ग्रामस्थ अंधारात?
कळसेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाल्यापासून आजवर या कारभाऱ्यांनी सलग सत्ता उपभोगली आहे. मात्र, या प्रदीर्घ काळात त्यांनी गावातील एकाही ग्रामस्थाला ट्रस्टचा सभासद करून घेतलेले नाही, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. नियमानुसार दरवर्षी होणारी 'वार्षिक सर्वसाधारण सभा' (AGM) एकदाही न झाल्याने आणि देवस्थानचा आर्थिक ताळेबंद गावासमोर मांडला न गेल्याने, हे विश्वस्त कारभार पाहत होते की स्वतःचेच वर्चस्व गाजवत होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
घटनेत फेरफार की धूळफेक?
नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीपूर्वी ट्रस्टची मूळ उपविधी (घटना) सार्वजनिक करण्याचे धाडस विश्वस्त मंडळ दाखवणार का? विद्यमान मंडळाने स्वतःचे पद कायम राखण्यासाठी घटनेत काही जाचक अटी तर घुसवल्या नाहीत ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. जर उपविधीमध्ये ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या तरतुदी केल्या असतील, तर ती गावासोबत केलेली मोठी प्रतारणा ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
ट्रस्टीनी हे करायला हवे..
१. सार्वजनिक उपविधी: ट्रस्टची घटना तातडीने गावासमोर जाहीर करावी.
२. खुली सभासद नोंदणी: गावातील प्रत्येक इच्छुकाला सभासद होण्याचा अधिकार द्यावा.
३. लोकशाही पद्धतीने निवड: सामंजस्याने किंवा रीतसर निवडणूक प्रक्रियेद्वारे नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करावे.
देवाचा न्याय आणि ग्रामस्थांचा रोष..
ज्या विश्वासाने गावाने या कारभाऱ्यांकडे देवस्थानची धुरा सोपवली, त्या विश्वासाला ते किती जागले, याचा हिशोब आता ग्रामस्थ मागत आहेत. "विद्यमान विश्वस्तांचे कर्तव्य पूर्ण झाले असेल, तर त्यांनी सन्मानाने पदमुक्त होऊन नवीन रक्ताला संधी द्यावी. अन्यथा, चुकीच्या कारभाराला देवही माफ करणार नाही," अशी चर्चा गावात चर्चीली जात आहे.
आता चेंडू विद्यमान विश्वस्त मंडळाच्या कोर्टात असून, ते लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण करतात की खुर्चीला चिटकून राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0