Charity Scam || कळसेश्वर देवस्थानच्या घटनेत 'तहहयात' शब्दाचा घुसखोर अर्क; लोकशाहीचा गळा घोटून हुकूमशाहीकडे वाटचाल?
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले(अहिल्यानगर) : परमपूज्य सुभाषपुरी महाराज कळसेश्वर देवस्थानच्या मूळ रचनेला सुरुंग लावण्याचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले जात असल्याचे आता उघड झाले आहे. ट्रस्टच्या घटनेत 'तहहयात' (Life-term) हा शब्द वापरून लोकशाही मार्गाने होणारी निवड प्रक्रिया कायमची बंद करण्यात आली असून, यामुळे देवस्थानच्या भविष्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
'तहहयात' शब्दाचा घातक परिणाम: देवस्थान कोणाच्या बापाचे?
घटनेतील नियम क्र. ६ मध्ये विश्वस्त 'तहहयात' राहतील अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे देवस्थानवर खालीलप्रमाणे विपरीत परिणाम होतील:
• सत्तेचे केंद्रीकरण: एकदा निवडलेला विश्वस्त मरेपर्यंत पदावर राहिल्याने नवीन विचारांच्या आणि तरुण पिढीच्या भक्तांना देवस्थानच्या सेवेची संधी मिळणार नाही.
• जबाबदारीचा अभाव: पदाची भीती नसल्यामुळे विश्वस्त मनमानी कारभार करू शकतात, कारण त्यांना पायउतार करण्याची साधी प्रक्रियाही घटनेत कठीण करून ठेवली आहे.
• भ्रष्टाचाराला खतपाणी: निवडीची मुदत नसल्यामुळे पारदर्शकता संपते आणि देवस्थानची मालमत्ता ही काही ठराविक लोकांची खासगी जहागीर बनण्याचा धोका निर्माण होतो.
निवडीचे अधिकार नक्की कोणाकडे?
घटनेतील तरतुदीनुसार, जर एखादे विश्वस्त पद रिक्त झाले (मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे), तर ती जागा भरण्याचे अधिकार गावातील भक्तांना किंवा ग्रामसभेला नसून, 'उर्वरित विश्वस्त मंडळाला' देण्यात आले आहेत. म्हणजेच, हे मंडळ आपल्या सोयीचा आणि आपल्याच विचाराचा माणूस पुन्हा विश्वस्त म्हणून निवडू शकते. पदाधिकाऱ्यांची (अध्यक्ष, सचिव इ.) निवड दर ५ वर्षांनी होईल, असे म्हटले असले तरी विश्वस्त मात्र तेच राहणार असल्याने ही निव्वळ धूळफेक ठरत आहे.
भक्तांची व्याख्या: केवळ नावालाच सहभाग?
घटनेत 'भक्त' आणि 'सभासद' यांची व्याख्या करण्यात आली आहे, परंतु त्यांना निर्णय प्रक्रियेत कोणतेही स्थान दिलेले नाही. वार्षिक सर्वसाधारण सभा ही भक्तांची असेल असे म्हटले असले तरी, मुख्य अधिकार मात्र विश्वस्त मंडळाने स्वतःकडेच ठेवले आहेत. निवडीच्या पात्रतेमध्ये 'हिंदू समाजाची व्यक्ती' आणि 'कळस बुद्रुकचा कायम रहिवासी' असा उल्लेख आहे, मात्र प्रत्यक्षात गावाला निवडीच्या अधिकारापासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आले आहे.
ग्रामस्थांनो, आता तरी जागे व्हा!
घटनेत बदल करून ज्या पद्धतीने देवस्थानवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो मोडून काढण्याची वेळ आली आहे. ज्या विश्वस्तांनी 'तहहयात' राहण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यांना जाब विचारण्यासाठी गावाने एकवटणे गरजेचे आहे.
• प्रमुख मागणी: घटनेतील 'तहहयात' शब्द काढून त्याऐवजी ठराविक मुदतीची (उदा. ३ किंवा ५ वर्षे) निवड प्रक्रिया लागू करण्यात यावी.
• ग्रामसभेचा अधिकार: नवीन विश्वस्तांची निवड ही बंद दाराआड न होता. ट्रस्टला सभासद नोंदणी करून त्यातून ग्रामसभेमध्ये विश्वस्त निवड पारदर्शक पद्धतीने व्हावी, असा आग्रह धरण्याची गरज आहे.
कळसच्या भक्तांनी जर आता मौन सोडले नाही, तर पुढची अनेक वर्षे हेच 'नागोबा' देवस्थानच्या तिजोरीवर बसून राहतील, हे निश्चित!
ग्रामस्थांपुढील तांत्रिक अडचणी :
• संदर्भ नियम ६: "या न्यासाचे विश्वस्त तहहयात राहतील" - हाच तो सर्वात मोठा अडथळा.
• संदर्भ नियम १३(६): वार्षिक सर्वसाधारण सभा केवळ चर्चेसाठी, निर्णय मात्र विश्वस्तांचे.
• रिक्त जागा भरणे: रिक्त जागा उर्वरित विश्वस्त मंडळ भरणार, ग्रामस्थांना अधिकार नाही.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
0