मोठी बातमी : नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा; खराबवाडीत ड्रोनद्वारे सर्वेक्षणांनंतर अतिक्रमणधारकांना नोटीसा..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी (ता. खेड) परिसरातील नैसर्गिक ओढ्यांवर आणि पाणी प्रवाहाच्या मार्गावर केलेल्या अतिक्रमणांचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक प्रवाह अडवल्याने जंबुकरवस्ती आणि आरुवस्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्याने अनेक घरांमध्ये शिरकाव केल्याने रहिवाशांचे संसार उघड्यावर आले आहेत. परिस्थिती गंभीर झाल्याने नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी अखेर एनडीआरएफ (NDRF) टीमला पाचारण करण्याची वेळ प्रशासनावर आली. या गंभीर घटनेची दखल घेत आता खराबवाडी ग्रामपंचायत आणि खेड महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ड्रोनद्वारे अचूक सर्वेक्षण आणि कारवाई..
या अतिक्रमणांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून संपूर्ण गावातील ओढे आणि नाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून पाणी प्रवाहावर झालेली बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे स्पष्टपणे समोर आली आहेत. या पुराव्यांच्या आधारे, संबंधित अतिक्रमण केलेल्या नागरिकांना आणि प्लॉटिंग धारकांना प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
कायदेशीर कारवाईचा इशारा..
ज्या जागा मालकांनी, प्लॉटिंग धारकांनी नैसर्गिक पाण्याचे मार्ग अडवून तिथे प्लॉटिंग केली आहे, किंवा ओढ्यावर अतिक्रमण करून घरे व व्यावसायिक गाळे बांधले आहेत, त्यांच्यावर केवळ बांधकाम पाडण्याची कारवाईच नाही, तर नैसर्गिक प्रवाह अडवल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

प्रशासकीय भूमिका...
या गंभीर प्रकाराबाबत बोलताना खराबवाडीच्या ग्रामविकास अधिकारी नीलिमा जाधव म्हणाल्या की, "ज्यांनी ओढ्यावर अतिक्रमण केले आहे, अशा सर्वांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. या अतिक्रमणधारकांच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे कोणतीही हयगय केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल."

नागरिकांसमोर दोन पर्याय..
प्रशासनाने ड्रोनद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून सर्व सत्य बाहेर आल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. आता संबंधित नागरिक स्वतःहून आपल्या बेकायदेशीर बांधकामांचे अतिक्रमण काढून घेतात, की प्रशासनाच्या दंडात्मक आणि फौजदारी कारवाईला सामोरे जातात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1