Charity Scame || कळसेश्वर देवस्थानवर विश्वस्तांची 'राजेशाही'; ५ वर्षे झाली तरी हिशोब गुलदस्त्यात, ग्रामस्थांना सभासदत्वापासून रोखण्याचा 'अजेंडा' कोणाचा?
लोकन्याय मराठी विशेष प्रतिनिधी..
अकोले (अहिल्यानगर): पवित्र अशा परमपूज्य सुभाषपुरी महाराज कळसेश्वर देवस्थानचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यमान विश्वस्त मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी, अद्याप ग्रामस्थांसमोर कोणताही हिशोब मांडण्यात आलेला नाही. त्यातच, सामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक सभासदत्वापासून दूर ठेवून, श्रीमंतांच्या जोरावर ट्रस्टवर कायमचा ताबा मिळवण्याचा 'भुजंग' डाव तर आखला जात नाही ना? असा संतप्त सवाल आता कळस बुद्रुकच्या गल्लीबोळांतून विचारला जात आहे.
पाच वर्ष लोटली, पण हिशोबाचा पत्ता नाही!
कोणत्याही सार्वजनिक ट्रस्टला नियमानुसार दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन हिशोब सादर करणे बंधनकारक असते. मात्र, कळसेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांनी गेल्या पाच वर्षांत ना गावाला हिशोब दिला, ना कोणती जाहीर सभा घेतली. या कालावधीत झालेला खर्च, जमा झालेली देणगी आणि विकासकामे यांचा कोणताही लेखाजोखा समोर नसल्याने, देवस्थानच्या पैशांचा विनियोग नेमका कुणाच्या हितासाठी झाला? हा मोठा प्रश्न आहे.
५ हजारांची अट: सामान्य नागरिक सभासद व्हायचे नाहीत का?
काही वर्षांपूर्वी विश्वस्तांनी '५ हजार रुपये भरा आणि सभासद व्हा' असा अजब फतवा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गावातील जागरूक तरुणांनी याला कडाडून विरोध केल्याने तो डाव फसला. सभासद होण्यासाठी इतकी मोठी रक्कम आकारणे म्हणजे केवळ पैशावाल्यांची 'मक्तेदारी' निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. उद्या हेच पैशावाले सभासद होणार आणि तेच ट्रस्टवर मालक म्हणून बसणार, असा संशय आता बळावला आहे.
उपविधी (By-laws) मध्ये 'काळे-बेरे' असल्याची शंका..
ग्रामस्थांकडून आता एक गंभीर शंका उपस्थित केली जात आहे की, देवस्थान ट्रस्टच्या उपविधीमध्ये (नियमावलीत) विश्वस्तांनी स्वतःच्या फायद्याच्या आणि ग्रामस्थांच्या विरोधातील काही छुप्या तरतुदी तर करून ठेवल्या नाहीत ना? जर असे काही 'काळे-बेरे' केले असेल आणि गावाच्या हक्कावर गदा आणली असेल, तर गाव आणि प्रत्यक्ष 'देव'ही त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
'खुर्च्या खाली करा आणि नवीन रक्त येऊ द्या!'
पाच वर्षांचा कार्यकाळ संपूनही खुर्च्यांना चिटकून बसलेल्या विद्यमान मंडळाने आता तातडीने जागा रिकामी करावी, असा सूर गावातून उमटत आहे. गेल्या पाच वर्षांत केवळ 'आळशी कारभार' आणि मनमानी केल्याने नवीन ट्रस्टींची निवड प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. विश्वस्तांच्या या हलगर्जीपणामुळे आता नवीन सक्षम मंडळ नेमण्यात जर अडथळे आले, तर गावकरी याला कसे तोंड देणार आणि विश्वस्तांना कसा धडा शिकवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
"देवस्थान हे संपूर्ण गावाचे आहे, कोणाच्या खाजगी मालमत्तेचा हिस्सा नव्हे. विद्यमान विश्वस्तांनी आता स्वतःहून पायउतार होऊन नवीन तरुणांना संधी द्यावी, अन्यथा जनरेटा काय असतो हे येणाऱ्या काळात दिसेलच."
-एक आक्रमक ग्रामस्थ..
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
1
Wow
1