Kidnapping Case || गुन्हेगारीचा थरार: वासुली हद्दीतील 'अमेझॉन' कंपनीसमोरून तरुणाचे अपहरण; सराईत टोळीसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल.!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण (पुणे ): पुणे जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण परिसरात गुन्हेगारांचे धाडस कमालीचे वाढले आहे. वासुली गावच्या हद्दीतील 'अमेझॉन' (Amazon) कंपनीच्या गेटसमोरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकासह (अल्पवयीन) एकूण ७ जणांवर कारवाई केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (वय २६) हा तरुण वासुली येथील अमेझॉन कंपनीच्या गेटसमोर उभा असताना हा सर्व प्रकार घडला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी लाल रंगाची कार आणि नेक्सॉन कारमधून तिथे येत ऋषिकेश कल्हाटकर याला जबरदस्तीने गाडीत कोंबले. त्याला अज्ञात स्थळी पळवून नेत असताना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली. औद्योगिक पट्ट्यात भररस्त्यात घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
गुन्हेगारांवर कलमांचा बडगा...
या प्रकरणी पोलिसांनी सागर बाळू जावळे, नितीन संजय शिटे, सौरभ अनिल ढोरे, अजय भरत गोपाळे, कुणाल प्रशांत चव्हाण आणि ओमकार यमराज कोरडे यांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या एका विधीसंघर्षित बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ११८(१), १०९, १०५ आणि ३(५) यांसारख्या अत्यंत गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्याकडून तपास सुरू...
या संपूर्ण गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कल्याण घाडगे हे करत आहेत. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि प्रत्यक्ष सहभागी आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम वेगाने सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणातील गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने आणि इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यावर भर दिला आहे.
नागरिकांचा संताप आणि कडक कारवाईची मागणी..
वासुली आणि चाकण परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. "कंपन्यांच्या गेटसमोरून जर लोकांचे अपहरण होत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींवर केवळ गुन्हा दाखल न करता, त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण होईल, अशी आग्रही मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1