राजकीय : खेड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष..!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड : पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचला आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी, प्रत्यक्ष निकालाची तारीख जशी जवळ येत आहे, तशी उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. सोमवार, दिनांक ९ रोजी जाहीर होणाऱ्या निकालामुळे खेड तालुक्यातील आगामी पाच वर्षांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये झालेली चुरस ऐतिहासिक मानली जात आहे.
खेड तालुक्यात पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषद गटांच्या निवडणुकांमध्ये अधिक 'हाय-व्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला. तालुक्यातील आठही गटांमध्ये स्थानिक मुद्द्यांपेक्षा पक्षीय प्रतिष्ठा आणि नेत्यांची वैयक्तिक ताकद पणाला लागली आहे. मतदानानंतरच्या काळात प्रत्येक गटात विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः पिंपळगाव तर्फे खेड-मरकळ आणि मेदणकरवाडी यांसारख्या गटांमधील लढतींनी राजकीय जाणकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
सर्वात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत पिंपळगाव तर्फे खेड-मरकळ गटात पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना (शिंदे गट) कडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे श्रीनाथ लांडे आणि शिवसेना (ठाकरे गट) कडून मशाल चिन्हावर रिंगणात असलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे यांच्यात थेट संघर्ष झाला आहे. विजय शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि श्रीनाथ लांडे यांची युवा फळी यांच्यातील ही लढत अटीतटीची झाली आहे. या गटात कोण बाजी मारणार, यावर तालुक्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटांचे वर्चस्व अवलंबून असणार आहे.
दुसरीकडे, मेदणकरवाडी-काळूस गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात 'काटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. येथे 'घड्याळ' चिन्हावर बाजार समितीचे विद्यमान संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात 'मशाल' चिन्हावर गणेश अरगडे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. नानेकरवाडी-महाळूंगे गटातही अशीच स्थिती असून, येथे राष्ट्रवादीचे गणेश बोत्रे आणि मशालीचे जीवन खराबी यांच्यात सामना झाला आहे. विशेष म्हणजे, या गटात निकाल लागण्यापूर्वीच गणेश बोत्रे यांच्या समर्थकांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत गुलाल उधळल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कुरुळी गटात महिला उमेदवारांमध्ये चुरस असून, येथे मशाल चिन्हावर विनया मुंगसे आणि घड्याळ चिन्हावर शितल येळवंडे आपले नशीब आजमावत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, विनया मुंगसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी शितल येळवंडे यांनी छुप्या मतदानाचा आधार घेतल्याची चर्चा आहे. खेड तालुक्यातील सर्वात चर्चेचा आणि वादाचा ठरलेला गट म्हणजे वाकी-चाकण परिसर. येथे राजकीय डावपेचांचे धनी मानले जाणारे शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद (मशाल) आणि दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या सून नीताताई गोरे (धनुष्यबाण) यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. या गटात 'गालबोट' लागण्याच्या घटना घडल्याने येथील निकालाकडे सर्वांची उत्सुकता आहे.
रेटवडी-वाफगाव गटात दीप्ती भोगाडे (मशाल), अश्विनी पाचरणे (घड्याळ) आणि रोहिणी थिगळे (धनुष्यबाण) यांच्यात महिला राजकारणाचे नवे समीकरण पाहायला मिळाले. कडूस गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय घनवट यांच्या भावजई तनुजा घनवट आणि अंकुश राक्षे यांच्या पत्नी वसुधा राक्षे यांच्यात 'काटा लढत' झाली आहे. शेवटच्या आठव्या गटात, म्हणजेच वाडा गटात तिरंगी लढत असून विठ्ठल वनघरे, डॉ. संतोष सुपे आणि समीर सुपे यांच्यापैकी जनता कोणाच्या झोळीत मतांचे दान टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राजकीय विश्लेषकांच्या मते, "या वेळची निवडणूक ही केवळ उमेदवारांची नसून ती पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे. खेड तालुक्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा कोणाला होतो, हे सोमवारी स्पष्ट होईल." कार्यकर्त्यांनी आतापासूनच फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची तयारी केली आहे. मात्र, मतदारांचा कौल कोणाकडे आहे, हे गुपित सोमवारी सकाळी उघड होईल. खेड तालुक्यातील या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवरही होणार असल्याने, राजकीय वर्तुळात या निकालाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
3
Love
0
Funny
2
Angry
0
Sad
1
Wow
0