सामाजिक || प्रशासनाला जाग कधी येणार? आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर माजी सरपंच शेडगे दांपत्याने स्वखर्चातून बुजवले वाघजाईनगर रस्त्यावरील जीवघेणे खड्डे!
लोकन्याय मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : चाकण-तळेगाव महामार्ग आणि चाकण-आंबेठाण जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या वाघजाईनगर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर प्रशासनाच्या दिरंगाईची वाट न पाहता, खराबवाडी गावच्या माजी सरपंच काजल शेडगे व त्यांचे पती नवनाथ शेडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या खर्चातून हे खड्डे बुजवून रस्त्याची डागडुजी केली.

नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शेडगे दांपत्याने तात्काळ पुढाकार घेत स्वखर्चाने तब्बल ५ हायवा मुरुम रस्त्यावर टाकला. त्यानंतर रोलर फिरवून खड्डे व्यवस्थित दाबून रस्ता वाहतुकीसाठी सुलभ केला. त्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर कार्याबद्दल वाघजाईनगर ग्रामस्थांकडून शेडगे दांपत्याचे मनःपूर्वक आभार मानले जात असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माजी सरपंचांच्या पुढाकारामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी प्रशासकीय अनास्थेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. आतातरी संबंधित प्रशासनाने डोळे उघडून हा रस्ता योग्य त्या विभागाकडे वर्ग करावा आणि त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थ करत आहेत. आता तरी प्रशासन यावर ठोस उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0